वेध माझा ऑनलाइन - शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, असं सांगताना अजित पवारांनी २००३ मध्ये केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचं उदाहरण दिलं. मात्र, यावेळी अचानक मध्येच “आता भरपूर पाऊस झालाय” असं शंभूराज देसाई यांनी म्हणताच अजित पवार त्यांच्यावर चांगलेच संतापले. “शंभूराजे, आपण एकत्र काम केलं आहे. बोलत असताना मधे बोलायचं नसतं. पाऊस चांगला झाला म्हणताय. कोरडा दुष्काळ नाही, ओला दुष्काळ पडलाय. काय सांगताय पाऊस चांगला झाला? ओला दुष्काळच आहे ना? मी उदाहरण देत होतो. तुमच्याच मतदारसंघात पवनचक्क्या उभ्या केल्या. काहींनी सांगितलं की याची पाती मोठी आहेत म्हणून ढग अडले आहेत. काहीजण त्या तोडायलाही निघाले होते. लोकांना समजून घ्यायचं असतं. म्हणून मी म्हटलं दुष्काळाच्या काळात कृत्रिम पाऊस पाडायचा प्रयत्न झाला”, अशा शब्दांत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला आणि शंभूराज देेेसाई याना चांगलंच झापल
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यात अतिवृष्टी आणि मदतनिधीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. तसेच, यावेळी सत्ताधारी पक्षातील मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर अजित पवार चांगलेच भडकले.
अजितदादा पुढे म्हणाले राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एनडीआरएफच्या नियमांच्याही दुप्पट मदत जाहीर केल्याचा दावा केला आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत आज बोलताना केली.
“राज्यात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली की अनेक भागातल्या जमिनी पावसामुळे खरवडून गेल्या आहेत. तिथे एनडीआरएफचे नियम काहीही मदत करू शकत नाहीत. या जमिनींवर २-४ वर्ष तरी काही पिकणार नाही. काही ठिकाणी दुसऱ्याच्या जमिनीतला गाळ वाहून तिसऱ्याच्या जमिनीत गेला. सगळी पिकं अडचणीत आहेत. हे असताना तुम्ही घोषणा केली की एनडीआरएफच्या दुप्पट मदत जाहीर केली. पण ती मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्याचा सगळा खर्च प्रत्येक एकराला ११ ते साडेअकरा हजार खर्च येतो. पण तुम्ही हेक्टरी फक्त १३ हजार ६०० रुपये मदत जाहीर केली आहे. त्या शेतकऱ्यानं काय करावं?” असा सवाल अजित पवारांनी आपल्या भाषणात केला आहे.
No comments:
Post a Comment