Friday, September 2, 2022

ज्यांच्यामागे कधी जनाधार नव्हता अशानीच काँग्रेस श्रेष्ठींना शहाणपणा शिकवावा ही बाब अत्यंत दुर्दैवी ; काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका...

वेध माझा ऑनलाइन - ज्यांच्यामागे कधी फारसा जनाधार नव्हता अशांना मोठ्या राज्यांचे मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांनीच काँग्रेसच्या श्रेष्ठींना आता शहाणपण शिकवावे, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, या शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका करत ‘भारत जोडो’ यात्रा आता कॉंग्रेसची राहिली नाही, अशी टीका केली होती. या यात्रेत आपण सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेस घटनेप्रमाणे चालत नाही. २४ वर्षापासून पक्षात कार्यकारिणीच्या लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या नाहीत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दोन दिवसांपूर्वी केला होता.
गांधी कुटुंबियांनी खूप दिले असे सुनावले जाणार असेल तर तुम्ही देणारे कोण असे खडे बोल चव्हाण यांनी गांधी कुटुंबाला सुनावले होते. चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम करीत स्वतंत्र पक्ष स्थापन केल्याने गेल्या काही दिवसात काँग्रेसमध्ये गदारोळ माजला आहे. जी-२३ गटातील अनेक नेते गुलाब नबी आझाद यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे त्यापैकीच एक असल्याने त्यांच्यावर सुशील कुमार शिंदे यांनी टीका केली आहे.
कॉंग्रेसने आयुष्यात मला खूप काही दिले. मी कॉंग्रेसचा निष्ठावंत आहे, अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी मांडली. आझाद यांनी गांधी कुटुंबावर टीका करीत कॉंग्रेसला रामराम केल्याने पक्षात गेल्या आठवडाभरात गदारोळ माजला आहे. जम्मू काश्‍मीर वगळता देशातील कुणीही नेता आझाद यांच्यासोबत उघडपणे गेला नसला तरी जी-२३ मधील अनेक नेते आजही आझाद यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. मात्र, यापैकी केवळ पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे भूमिका घेतली आहे.


No comments:

Post a Comment