Wednesday, January 19, 2022

भाजप हा राज्याच्या नगरपंचायत निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसतोय. मात्र बोलबाला महाविकास आघाडीचाच होऊ लागल्याच स्पष्ट !..

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील 32 जिल्ह्यांच्या 106 नगरपंचायतींमधील 1802 जागांचा निकाल आज समोर येतोय. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप हा या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाच पक्ष ठरताना दिसतोय. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा नंबर लागतोय. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपला सर्वाधिक 379 जागांवर यश आलेलं आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला 359, शिवसेनेला 297, काँग्रेसला 281 आणि इतर 253 जागांवर विजय मिळाल्याचं चित्र आहे. वास्तविक बघायला गेलं तर या निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरताना दिसला असला तरी महाविकास आघाडीने सर्वाधिक जागांना कवेत घेतल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीला एकूण 937 जागांवर यश मिळालं आहे. मतमोजणी अद्यापही सुरु आहे. निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. पण महाविकास आघाडीचा या निवडणुकीत बोलबोला असल्याचं स्पष्ट दिसतंय.

आतापर्यंत समोर आलेली आकडेवारी :

भाजप - 379
राष्ट्रवादी काँग्रेस - 359
शिवसेना - 297
काँग्रेस - 281

इतर - 253

बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रतिष्ठितांना धक्का देत निर्णायक निकाल हाती आले आहेत. आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला आहे. हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का समजला जात असून स्थानिक स्वराज्य संस्थेत पुन्हा एकदा सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडेनी बाजी मारली आहे. केज नगरपंचायतमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील नगरपंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांना पराभव सहन करावा लागला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाऊ मुंडे यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यामुळे भाजपला एक मोठा धक्का समजला जात आहे.

औरंगाबादमध्ये भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना यश आलंय. तर दुसरीकडे नांदेडमध्ये काहीसं वेगळं चित्र बघायला मिळालं आहे. अमरावतीत मंत्री यशोमती ठाकूर यांचं जसं वर्चस्व अबाधित राहिलेलं बघायला मिळालंय. तसंच नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीतही बघायला मिळतंय. नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंतायतींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायतींचा समावेश आहे. या तीनही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला निर्विवाद विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे नायगाव नगरपंचायतीत काँग्रेसला तब्बल 17 पैकी 17 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे नायगावमध्ये भाजप आमदार राजेश पवार यांची सत्ता आहे. त्यामुळे भाजप आमदार राजेश पवार यांना हा सर्वात मोठा झटका आहे.

नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जिल्ह्यातील तीनही नगर पंचायतीत मुसंडी मारली आहे. काँग्रेसने नायगाव पाठोपाठ अर्धापूर नगरपंचायतीत 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता मिळवली आहे. तर माहूर नगरपंतायतीवरही काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. माहूर नगरपंतायतीत 17 पैकी 6 जागांवर यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात आणि शिवसेनेला तीन जागांवर यश मिळालं आहे.

भाजपला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी ज्या मतदारसंघात सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लावली होती त्या जागेवर भाजपचा पुन्हा पराभव झाल्याचं दृश्य आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं पुन्हा एकदा निर्विवाद असं वर्चस्व राहिलं आहे. कारण आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकणू 17 जागांपैकी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवारांचा 11 जागांवर विजय झाला आहे. तसेच एक जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीने एकूण 12 जागांवरील विजय खिशात घातला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे या नगरपंचयातीत काँग्रेसलाही 3 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे कर्जतच्या नगरपंचायत निवडणुकीच महाविकास आघाडीचा तब्बल 15 जागांवर विजय झाला आहे.

No comments:

Post a Comment