वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ख्याती असलेल्या सांगलीच्या कडेगांव नगरपंचायतीत अखेर भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचं हे गाव आहे. तरीदेखील त्यांच्या पदारात या निवडणुकीत अपयश आल्याचं चित्र आहे. कडेगांव नगरपंचायतीत भाजपने तब्बल 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत एका जागेवर विजय मिळवला आहे.
कडेगांव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता राहण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे माजी दिवंगत मंत्री डॉ. पतंगराव कदम यांची पुण्याई. पतंगराव कदम यांनी आपल्या 15 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत कडेगांवात प्रचंड विकासकामे केली. त्यामुळे त्यांच्याप्रती आत्मीयता बाळगणारा एक वेगळा चाहता वर्ग इथे आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कडेगांवमध्ये हवी तशी कामे झाले नाहीत. त्याचाच परिणाम आजच्या निवडणुकीच्या निकालात प्रतिबिंब होताना दिसत आहे.
कडेगावात तिरंगी लढत
कडेगावात यावेळी तिरंगी लढत झाली. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या विरोधात जाऊन वेगळं होऊन स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्याचा बराच फटका काँग्रेसला बसला असण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला आपलं खातं उघडण्यात यश आलं असलं तरी काँग्रेससाठी खूप मोठा पराभव आहे. तर दुसरीकडे भाजपने पणाला लावलेली सर्व शक्ती आज विजयी झाली. कडेगांव नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या सर्व पदाधितारी-कार्यकर्त्यांनी एकवटून जोर लावला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे
No comments:
Post a Comment