Wednesday, May 17, 2023

मुंबईत झालेल्या "त्या' दशतवादी हल्ला प्रकरणात भारताला मोठं यश ; "आरोपी' च्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने दिली परवानगी :

वेध माझा ऑनलाइन । 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यता दिली.

16 मे रोजीच्या 48 पानांच्या आदेशात, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी सांगितलं की, सुनावणीच्या वेळी युक्तिवादासाठी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे न्यायालयाने पुनरावलोकन केले आणि त्यावर विचार केला. ज्या गुन्ह्यांसाठी त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती करण्यात आली आहे, त्या गुन्ह्यांसाठी 62 वर्षीय राणा प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे, असं न्यायाधीशांनी सांगितलं.
26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. राजनयिक माध्यमांद्वारे त्याला भारतात आणण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यास तयार असल्याचे एनआयएने म्हटले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या 26/11 च्या हल्ल्यातील राणाच्या भूमिकेची एनआयएकडून चौकशी सुरू आहे.
न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, अमेरिकन सरकारच्या वकिलांनी युक्तिवाद केला की राणाला माहित होतं की त्याचा बालपणीचा मित्र, पाकिस्तानी-अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होता. त्यामुळे त्याने हेडली, दहशतवादी संघटना आणि त्याचे सहकारी यांच्या कारवायांमध्ये मदत केली आणि बचावही केला. .
दुसरीकडे राणाच्या वकिलाने प्रत्यार्पणाला विरोध केला. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह एकूण 166 जणांचा मृत्यू झाला होता. हे हल्ले 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले होते. मुंबईतील प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले 60 तासांहून अधिक काळ सुरू होते.
भारत आणि अमेरिका यांच्यात प्रत्यार्पण करार आहे. राणाचे भारताकडे प्रत्यार्पण हे पूर्णपणे कराराच्या अधिकारक्षेत्रात होते, असा निकाल न्यायाधीशांनी दिला. या हल्ल्यामध्ये दहशतवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेला होता, त्याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी भारतात फाशी देण्यात आली होती. या हल्ल्यादरम्यान उर्वरित दहशतवादी भारतीय सुरक्षा दलांनी मारले.

No comments:

Post a Comment