Thursday, May 25, 2023

बारावीचा निकाल जाहीर ; गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के झाली घट ; काय आहे कारण?

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालानुसार यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे. म्हणजेच,यंदा निकालात घट झाली आहेत. मात्र त्यामागचं कारणही मंडळाने दिलं आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, यंदा निकाल २.९७ टक्क्यांनी घटला आहे. कारण, मागील परीक्षा वेगळ्या वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांना ७०, ८० आणि १०० गुणांसाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. ७५ टक्के अभ्यासक्रमांवर परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. कोणताही वाढीव वेळ देण्यात आला नाही.

२०२३ मध्ये ज्याप्रमाणे नियमित परीक्षा झाली तशी परिक्षा २०२० मध्ये घेण्यात आली होती. २०२० मध्ये ९०.६६ टक्के निकाल लागला होता. तर, २०२३ मध्ये ९१.२५ टक्के निकाल लागला आहे. म्हणजेच ०.६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असंही ते पुढे म्हणाले.

 यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांन अधिक आहे.


No comments:

Post a Comment