वेध माझा ऑनलाइन - भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. यावर मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे अतिरेकीपणा आहे,” असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं. तसेच या आरोपीचा खटला आमची टीम मोफत लढेल, अशी घोषणाही केली. त्यांनी रविवारी (११ डिसेंबर) ट्वीट करत आपली भूमिका मांडली.वकील असीम सरोदे म्हणाले, ”शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व 120 ब,आर्म्स ऍक्ट चा वापर अतिरेकीपणा आहे,यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे
“आरोपींचा खटला मोफत चालवणार”
“यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची कायदेशीर टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु, शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध,” असंही असीम सरोदे यांनी नमूद केलं आहे.
“सरकार तालिबानींसारखे वागू लागले आहे”
या प्रकरणावर राजू शेट्टींनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “शाईफेकीचे समर्थन करणे चुकीचे आहे, पण शाई फेकणाऱ्या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानींसारखे वागू लागले आहे असे वाटते. ३०७ म्हणजे धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न आणि ३५३ म्हणजे सरकारी कामात अडथळा याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे हे सरकारी काम आहे का?”
“सरकारने ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला, त्यांच्यावर ३०२ कलम का लावले नाही?”
“मग हा कायदा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ज्या सरकारने ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला त्याला जबाबदार असणाऱ्यांवर ३०२ सह ही कलमे का लावण्यात आले नाहीत?” असा प्रश्न राजू शेट्टींनी विचारला.
No comments:
Post a Comment