वेध माझा ऑनलाईन - मागील काही दिवसांपासून पुणे मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील 400 मनसे कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसे कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश माझिरे यांच्यासह 400 पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.
नीलेश माझिरे यांनी माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या आठव़ड्यात पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यातच माझिरे यांची हकालपट्टी आणि राजीनामा यामुळे पुणे मनसेत अलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहेत. नीलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे खंदेसमर्थक असल्याने माझिरे यांना माथाडी कामगार जिल्हाध्यक्षपदावरून हटवल्याने मोरे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.एकीकडे पक्षबांधणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करत असताना दुसरीकडे पुण्यात 400मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
No comments:
Post a Comment