Wednesday, June 29, 2022

इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चिट!!

वेध माझा ऑनलाइन - उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांने केलेल्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आले होते. या बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू यांचाही सहभाग होता. इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. 

अकोल्याचे मावळते पालकमंत्री बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे.. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर होता. वंचित बहूजन आघाडीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर आरोप झाले होते.  हे प्रकरण कोर्टात दाखल होतं. सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे.  
 
वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. याची ठिणगी तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून पडली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितनं केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी एक कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. यात रस्त्यांचे 'ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक' नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितनं केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती. 


No comments:

Post a Comment