वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे हे शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन राज्याच्या बाहेर आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदार असल्यानं ठाकरे सरकार अल्पमतामध्ये आल्याचं मानलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी या लाईव्हमधून अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. या लाईव्हमध्ये त्यांनी भावनिक आावाहनावर भर दिला.
वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील इमोशनल मुद्दे...
हिंदुत्व हा शिवसेना श्वास. शिवसेना आणि हिंदुत्व हे एकमेकांमध्ये गुंफलेलं आहे. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. असं काय केलं की हिंदुत्वापासून दूर गेलो असं वाटलं? आधीही शिवसेना हिंदुत्त्ववादी आताही हिंदुत्ववादीच आहे.
सत्तेच्या अडीच वर्षात जे मिळालं ते बाळासाहेबांनीच दिलं. मला सत्तेचा मोह नाही.
आपल्या माणसांना शोधावं लागणं ही कसली लोकशाही?
शरद पवारांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी विश्वास टाकला. प्रशासननंही मला सांभाळले
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. आजच कमलनाथ यांच्यासोबत माझं बोलणं झालं.
माझ्याच लोकांना मी मुख्यमंंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. मी आजच वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर जाण्यास तयार आहे.
आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करत आहे. गायब आमदारांनी समोर येऊन माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे. कोरोना नसता तर मीच राजीनामा घेऊन गेलो असतो.
शिवसैनिकांनी सांगावं मी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी योग्य नाही, मी शिवसेना प्रमुखपद सोडण्यास तयार आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असल्यास आनंदच आहे.
मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे.
No comments:
Post a Comment