Friday, October 27, 2023

सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी झाल्याने कोयना धरणातून१०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग ;

वेध माझा ऑनलाइन। सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचा समजला जातो. पण, यंदा पर्जन्यमान कमी राहिल्यामुळे अनेक गावात पाणी टंचाई भासत आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यंदा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण भरले नसले तरी सांगली पाटबंधारे विभागाकडूनही मागणी झाल्याने धरणातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग आज दुपारी एक वाजता सुरू करण्यात आला आहे.

कोयना धरणात सध्या ८९ टीएमसीवरच साठा शिल्लक आहे. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीमएसी इतकी आहे. धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच पिण्यासाठीही पाण्याची तरतूद आहे. तर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठीही पाणी विसर्ग करण्यात येतो. धरणाच्या आतापर्यंतच्या सुमारे ६० वर्षांच्या इतिहासात कोयना धरण ९ वेळा भरलेले नाही.
यावर्षी तर पाऊस कमी असल्याने धरणातील पाणीसाठा ९३ टीएमसीपर्यंतच पोहोचला. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन त्यातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. तर एक महिन्यापूर्वीही सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी झाल्याने धरणातून पाणी विसर्ग करण्यात आलेला. गेल्या २ महिन्यात ३ वेळा सांगलीसाठी पाणी सोडण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment