वेध माझा ऑनलाइन। राज्यात मराठा आरक्षणाची धग कायम असतांना गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. 'मराठा आरक्षणाचा वाद शरद पवार, उद्धव ठाकरेंनी उभा केला आहे. जोर जबरदस्ती करुन आरक्षण मिळवता येत नाही. मराठा समाजाने मागासवर्गीय बनण्याच्या फंदात पडू नये, असे वक्तव्य सदावर्ते यांनी केले आहे. वसईत विनोद भरणे यांच्या मुलीच्या विवाहासाठी सदावर्ते यांनी हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते.
सदावर्ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा वाद उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पावर यांनी हा वाद उभा केला आहे. येणाऱ्या काळात मराठा समाजातील बांधवांना कळेल की आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारणी आपली पोळी भाजत आहे. मराठा समाज आरक्षणात बसत नाही. मराठा समाजातील बांधवांनी मोठं मोठ्या पदावर जावं पण मागासवर्गीय होऊन जाण्याच्या शोधण्याच्या भानगडीत पडू नये.
जोर जबरदस्ती करुन आरक्षण मिळवता येत नाही : सदावर्ते
मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. या विषयी बोलताना सदावर्ते म्हणाले, अरे गाडी फोडली तर आरक्षण मिळेल का? मला मारून टाकलं तर आरक्षण मिळेल का? तुम्हालाच आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. तुम्ही आरक्षण मागा पण जोर जबरदस्तीने केलेल्या मागणीला भरताचे संविधान मान्यता देत नाही
गुणरत्न सदावर्तेंची मराठा समाजावर सातत्याने टीका
मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसल्यापासून गुणरत्न सदावर्ते सातत्याने समाजावर टीका करत होते. त्यामुळं मराठा समाज नाराज होता. गुणरत्न सदावर्ते यांना बोलू नका, असाही इशारा देण्यात आला होता. जरांगे पाटील यांनीही थेट इशारा दिला होता. त्यानंतर देखील सदावर्ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या सदावर्ते यांच्या विरोधात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
सदावर्ते नेमकं काय म्हणाले होते?
“जरांगे पाटलांची सभा हे केवळ एका यात्रेचं स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात. मला सायलेंट करण्यासाठी बोललं जातं, पण मी सायलेंट होणार नाही. जरांगेचे पॉलिटीकल बॉसेस वेगळे आहेत. जरांगेंनी त्यांच्या पॉलिटीकल बॉसेसला दाखवून दिलंय की ते किती लॉयल आहेत,” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते.
No comments:
Post a Comment