Wednesday, October 25, 2023

आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करणार्यांनी निर्लज्जपणे मला 50 कोटी मागितले ; मुख्यमंत्री शिंदेंचा दसरा मेळाव्यात गौप्यस्फोट ;

वेध माझा ऑनलाइन। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फारकत घेत 40 आमदारांसह भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे यांच्यासह 40 आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट करत आहे. त्याला सव्वा वर्षात शिंदे यांनी थेट उत्तर दिले नव्हते. पण आता दसरा मेळाव्यात त्यांनी याबाबत गौप्यस्फोट केला. ‘निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आल्यानंतर यांनी बँकेकडे 50 कोटी रुपये मागितले. बँकेने त्याला नकार दिला. त्यानंतर निर्लज होऊन त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच 50 कोटींची मागणी करता. तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे. त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले.’ असेही त्यांनी सांगितले.

पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेऊन फाईव्ह स्टार हॉटेलात गेलात
कोविडच्या काळात तुम्ही घरी बसला होता, त्या काळात पीपीई किट घालून स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि लोकांच्या भेटीला गेलो. तुम्ही घरी बसून पैसे मोजत होता. खिचडीमध्ये घोटाळा केला, डेड बॉडी बॅगेत घोटाळा केला. 26 जुलै 2005 सालच्या पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेऊन तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलात गेलात. तुम्ही बाळासाहेबांचे होऊ शकला नाहीत आमचे काय होऊ शकता. असंही आरोप शिंदे यांनी केला.

ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले
पवारांकडे दोन माणसे पाठवले आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा असे त्यांना सांगितले . 2004 सालापासून त्यांना ही इच्छा होती, पण जुगाड काही लागत नव्हता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच टूनकण उडी मारली आणि तिकडे खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, पोटातले पाणी पण हलू दिले नाही. शेवटपर्यंत त्यांनी समजू दिले नाही. सीतेचे हरण करण्यासाठी रावणाने साधूचे रूप घेतले होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले.

आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, 
बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेले अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फुल एक हाफ, कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे हे महागद्दार आहेत, त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
सावरकरांचा अपमान ज्यांनी केला तो मणिशंकर अय्यर याला बाळासाहेबांनी जोडे मारण्याचे काम केलं आणि त्याच काँग्रेसचे जोडे आज हे लोक उचलत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मला विचारलं होत,आनंद दिघेची संपत्ती कुठे आहे?
राज ठाकरे यांच्याबद्दल धर्मवीर आनंद दिघेंनी दोन शब्द चांगले बोलले, लगेच यांच्या पोटात दुखलं. दिघे यांचे पंख छाटण्याचं काम सुरू केलं, मी साक्षीदार आहे. त्यांचा अपघात झाला, त्यावेळी ते आले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतरही आले नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर मला विचारलं की आनंद दिघेंची संपत्ती कुठे आहे. असाही आरोप शिंदे यांनी केला.उद्धव ठाकरेंनी जर ठरवले तर त्याचा काटा काढतातच. अशा अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. या एकनाथ शिंदेला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. मला लक्षात आल्यानंतर त्यांचाच टांगा पलटी अन् घोडे फरार केला. असेही शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment