वेध माझा ऑनलाइन। माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून घेतलेल्या निवृत्तीमुळे ‘ऑल इज नॉट वेल’चे संदेश जात आहेत. निलेश राणे यांनी ऐन विजयादशमीच्या दिवशी सकाळी ट्वीट करून सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, असे ट्विट करून कोकणातील राजकारण घुसळून टाकले आहे. त्यांनी अचानक एवढा मोठा निर्णय ट्वीट करून जाहीर करताना भाजप पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली होती का, याबाबत नक्की माहिती मिळत नाही. पण निलेश राणे यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे आमदार बंधू नितेश राणे भाजपमध्ये सक्रिय आहेत. असे असताना निलेश राणेंनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्याने अनेक उलटसुलट चर्चा होत आहेत.
निलेश राणे २००९ मध्ये खासदार होते. त्यानंतर सलग दोन वेळा ते खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले. आता २०२४ साठी त्यांना आमदारकीचे तिकीट देण्याची चर्चा सुरू आहे. तर लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा यापूर्वीच सुरू झाली आहे. रविंद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असून ते भाजपचे आमदार आहेत. शिवाय ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाही लोकसभेचे वेध लागल्याची चर्चा आहे. यात भर पडली आहे ती रविंद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यातील जवळीकीची. या दोघांमधील जवळीक निलेश राणेंना पसंत नसल्याची चर्चा आहे. या सर्व कुरघोडीच्या राजकारणामुळे त्यांनी सक्रीय राजकारणातून काडीमोड घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
No comments:
Post a Comment