वेध माझा ऑनलाइन - एसटी महामंडळाच्या गाड्यांना नेमकं झालंय काय ? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. 24 तासांपूर्वी पुण्यात शिवशाही बसला आग लागली होती. ही घटना ताजी असताना आता नाशिक पुणे महामार्गावर आणखी एका शिवनेरी बसने पेट घेतला आहे.
नाशिक पुणे महामार्गावर चालत्या एसटी बसने पेट घेतला. नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या शिवनेरी बसने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेताच प्रवाशी गाडी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. नाशिकहून ही बस पुण्याला जात होती. पण अचानक गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे लगेच चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली.
प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही क्षणात बसने पेट घेतला. बघता बघता बसला भीषण आग लागली. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूने वाहनं थांबवण्यात आली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहे. मात्र, या दुर्घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पुण्यातील येरवडा परिसरामध्ये एसटी महामंडळाची शिवशाही बस जळून खाक झाली. सुदैवाने या बसमधील 42 प्रवासी हे वेळीच खाली उतरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुण्यातील येरवडा येथील शास्त्री चौकात ही घटना घडली.
यवतमाळहून चिंचवडकडे ही बस आली होती. शास्त्रीचौकात पोहोचल्यानंतर शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेतली.
त्यानंतर गाडीतील सर्व 42 प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितलं. काही मिनिटात सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये बसने पेट घेतला.
चालकाने वेळीच बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही. मात्र, बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
No comments:
Post a Comment