वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. भाजप नकली रंग उधळत आहे. भाजपचा भगवा भेसळयुक्त आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आम्ही राजकीय धुळवड कधीच खेळत नाहीत. पण सध्या महाराष्ट्रात रोजच धुळवड खेळली जात आहे. पण वर्षातून एकदा अशा लोकांची धुळवड करायला हरकत नाही. होळी आणि शिमग्यात फरक आहे. भाजपनं शिमग्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. त्या पद्धतीनं रंग खेळावेत. महाराष्ट्राचा रंग स्वाभिमानाचा, ऐक्यतेचा, अखंडतेचा आहे हे त्यांनी समजून घ्यावं, असं संजय राऊत म्हणाले.
काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही
राऊतांनी म्हटलं की, काल शरद पवारांनी जी भूमिका मांडली की, घाबरु नका भाजप सरकार येणार नाही. ही भूमिका केवळ राष्ट्रवादीची नाही तर महाविकास आघाडीची आहे. काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही. अडीच वर्ष झाले महाविकास आघाडी सरकारला. पुढचे अडीच वर्षही आम्ही सत्तेत राहणार आहोत आणि त्यानंतरचे पाच वर्षही आम्हीच सत्तेत राहू असे खासदार राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न करत राहावं. ते आता गोवा जिंकून आले आहेत. मात्र गोवा काय आहे हे लवकरच भाजपला कळेल. गोवा पोर्तुगाल आणि इंग्रजांनाही कळला नव्हता, असंही राऊत म्हणाले. केंद्रीय यंत्रणांना घाबरत नाही, असंही ते म्हणाले. विरोधकांनी सुसंस्कृतपणा, राजकारणातील विनोद, संवेदनशील मन नष्ट केलं आहे. या राज्यात असं वातावरण कधीच नव्हतं, जे दुर्देवाने आमच्या भाजपच्या मित्रांनी करुन ठेवलं आहे, असं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाचा प्रश्न जाणूनबुझून जटील केला जात आहे, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment