Sunday, October 16, 2022

राज ठाकरेंच देवेंद्र फडणवीस यांना पत्र ; अंधेरी निवडणूक न लढवण्याचा दिला भाजपला सल्ला ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन -  दिवंगत लोकप्रतिनिधीला आपण श्रद्धांजलीच वाहतो. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे' असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक लढवू नये आणि ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं असेही राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे.

रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं, अशी विनंती राज ठाकरे यांनी फडणवीस यांना केली.मी आमच्या पक्षातर्फे परिस्थितीत दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे, आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी आज सकाळी भेट घेतली. बीसीसीआय खजिनदार झाल्यानंतर आशिष शेलार यांनी पहिल्यांदाच राज ठाकरे यांची भेट घेतली. भाजपकडून मुंबई महापालिकेची जबाबदारी आशिष शेलारांवर दिली आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ही भेट महत्वाची आहे.

No comments:

Post a Comment