वेध माझा ऑनलाइन - ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन पुणे संलग्न कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या सोडवाव्यात, यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कराड तालुक्यातील जवळपास 300 स्वस्त धान्य दुकानदार सहभागी झाले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ मागण्या मार्गी लावाव्यात अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अशोकराव पाटील यांनी दिला आहे.
अशोकराव पाटील म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांनी कोरोना काळात शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत धान्य वाटप करण्याचे काम केले. अद्याप मोफत धान्य वाटपाचे काम सुरू आहे. मात्र शासनाने मोफत धान्य वाटप केल्याचे कमिशन अध्याप दिलेले नाही. वास्तविक राज्यातील इतर जिल्हय़ातील स्वस्त धान्य दुकानदारांना या काळातील पैसे मिळाले. सातारा जिल्हय़ातील दुकानदारांना मात्र अद्याप पैसे मिळाले नाहीत.
ई-पॉस मशीनवर येणाऱया तांत्रिक अडचणी तत्काळ दुरूस्त करून देण्याची व्यवस्था करावी. सध्या नियमित धान्य वाटपाबरोबरच मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. नवीन नियमानुसार दोन्ही धान्य वाटपाचे वेगवेगळे अंगठे घेणे बंधनकारक आहे. यामुळे दुकनदाराबरोबरच ग्राहकालाही त्रास होत आहे. ग्रामीण भागात वारंवार मशिन बंद पडत असल्याने एकाच अंगठयावर दोन्ही धान्य वाटपाची शासनाने परवानगी द्यावी.
कराड शहर व परिसरात धान्य अत्यंत खराब येत असून चांगल्या धान्याचा पुरवठा करण्यात यावा. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मशीनवर माल विक्रीसाठी उपलब्द करूण देण्यात यावा. ई-पॉस मशिनला सध्या टु जी नेटवर्कचे सिमकार्ड आहे. त्यामुळे वारंवार अडचणी येत आहेत. त्यामुळे ई-पॉस मशिनला फोर जी किंवा फाईव्ह जी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या केशरी एपीएल कार्डधारकांना धान्य मिळत नाही. अशा कार्डधारकांना धान्याचा पुरवठा करण्यात यावा. तसेच सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना विमा संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या केल्याचे अशोकराव पाटील म्हणाले.
कराडमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाला सातारा जिल्हय़ासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आदी जिल्हय़ातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे शासनाने स्वस्त धान्य दुकनदारांच्या तातडीने अडचणी दुर कराव्यात अन्यथा दिवाळीनंतर राज्य पातळीवर आंदोलन करण्याचा इशारा अशोकराव पाटील यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment