Sunday, October 23, 2022

शिंदे गटाचे 22 आमदार नाराज ? भाजप मध्ये जाणार? खुद्द शिंदे गटाच्या एका आमदाराने केला अंदाज केला व्यक्त ; शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक सदरामध्ये केला दावा ;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेत फूट पाडून भाजपात गेलेल्या शिंदे गटाचे राजकीय भवितव्य काय, यावर अनेकजण विविध प्रकारचे अंदाज वर्तवत असतात.खुद्द शिंदे गटाच्या एका आमदाराने शिंदे गटाविषयी अंदाज व्यक्त केला असून त्यांनी म्हटले आहे की, भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रामदास आठवले होईल. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक सदरामध्ये हा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत असाही दावा त्यामध्ये केला आहे

सामनाच्या रोखठोक मध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या 'तोतया' गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत.
यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, 'शिंदे यांचा रामदास आठवले होईल. हे विधान बोलके आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील. असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले?

सामनाच्या या लेखात पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी  रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले.

धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस व भाजपकडे जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत.पोलिसांच्या बदल्यांत व आपले अधिकारी नेमण्यात त्यांना जास्त रस आहे.कारण त्यांच्या चाळीस आमदारांना ते सर्व करून हवे. गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी हे बदली प्रकरण मानले नाही,तेव्हा मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले व सातार्‍यातील गावी गेले, असे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. ते थेट क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनाला अवतरले.मुख्यमंत्री व त्यांचा गट सध्या काय करतो? मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व करतो.ठाण्यातील 'दिवाळी पहाट' कार्यक्रमासाठी शिवसेनेस तलावपाळी परिसर मिळू नये यासाठी पुन्हा हायकोर्टात जावे लागले
व ठाणे महानगरपालिकेने शिंदे गटाने सर्वप्रथम परवानगी मागितली या सबबीखाली खासदार राजन विचारे यांना परवानगी नाकारली.पण दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्क मैदानासाठी हा नियम पाळला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपने या अशाच कार्यात गुंतवून ठेवले आहे, असे सामनाच्या रोखठोक सदरात म्हटले आहे.


No comments:

Post a Comment