वेध माझा ऑनलाइन - राज्यातील मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केली असून, त्यास भाजपाने पाठिंबा दिल्याने राज्यात वातावरण तापले आहे. मात्र सभेला प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिली नसल्याने संभ्रम कायम आहे. मनसे नेते मात्र मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यावर ठाम आहेत. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना याबाबत भाष्य केले आहे.राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी मिळणार की नाही याबाबत गृहमंत्र्यांनी भाष्य केले आहे.
“सर्व पक्षांच्या बैठकीत सर्व चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांना जाहीर सभा घ्यायची असेल तर त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अधिकार आहे. याबाबत सरकार निर्णय घेणार नाही,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.
“औरंगाबाद येथील राज ठाकरे सभेबाबत एक दोन दिवसांत औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील. ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि पोलीस महासंचालकांसोबत चर्चा करत आहेत. परिस्थिती पाहून त्यासंदर्भातील निर्णय आयुक्त घेतील,” असे वळसे पाटील म्हणाले. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल, असा इशाराही दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment