वेध माझा ऑनलाइन - वंचित बहूजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा मनसेवर टीका केली आहे. यासोबतच त्यांनी एक वादग्रस्त विधान ही केलं आहे. अमित राज ठाकरे यांना हनुमान चालीसा म्हणण्यासाठी पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं, अशा शब्दांत त्यांनी मनसेवर टीका केली आहे. तर दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय उच्चवर्गीय ब्राम्हण असतात, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असे सुजात आंबेडकर म्हणाले आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुजात आंबेडकर यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवा, असं म्हणत स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका असा सल्लाही सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना दिला आहे.
पुढे सुजात आंबेडकर म्हणाले की, आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ते बहूजन मुलं असतात.
राज ठाकरेंना माझे एवढंच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे, असंही सुजात आंबेडकरांनी म्हटलं आहे.
यावेळी सुजात आंबेडकरांनी भाजप आणि मनसेवर बोचरी टीका केली आहे. लोकांच्या भूकमारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असे सर्व आश्वासन देऊन भाजप सत्तेत आला. पण सत्तेत आल्यावर यावर कुणीही बोलायला तयार नाही. करोना काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती. त्यावर कुणीही बोलत नाही. असे असतानाही जर भाजप किंवा राज ठाकरे असेच हिंदू-मुस्लिम दंगलीवर बोलत असेल तर त्याचा सरळसरळ असा अर्थ होतो की, येथील लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. जेणेकरून महत्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष जाऊ नयेत, असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी मनसे आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
No comments:
Post a Comment