Thursday, April 7, 2022

यशवंत बँकेचा ३६० कोटींचा एकत्रित व्यवसाय ; बँकेस २ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा- शेखर चरेगांवकर,

वेध माझा ऑनलाइन - नुकत्याच झालेल्या २०२१-२२ या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला रुपये २ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय रुपये ३६० कोटी इतका झाला असून यामध्ये रुपये २०० कोटींच्या ठेवी जमा झाल्या असून रुपये १६० कोटींची कर्जे वितरीत केली गेली आहेत. बँकेची गुंतवणूक रुपये ४६ कोटी इतकी झाली आहे.

केवळ बँकेतच प्रत्येक ठेवीदारास मिळणारे रु.५ लाखापर्यंतचे ठेव विमा संरक्षण ही सर्व ग्राहकांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. याचाच लाभ घेत ग्राहकांनी बँकेतील गुंतवणुकीत वाढ केल्याचे अध्यक्ष चरेगांवकर यांनी सांगितले.

बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी व सोलापूर या जिल्ह्यांचे असून सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने बँकेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरीक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके बँकेने पूर्ण करून मागील सलग ९ वर्षे बँकेस शासकीय लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला आहे. या ही २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी देखील बँकेने आवश्यक ती सर्व आदर्श प्रमाणके पूर्ण केली आहेत. ठेव, कर्जे, भागभांडवल, गुंतवणूक या सर्वात वाढ करत मागील वर्षीच्या तुलनेत एनपीएचे प्रमाण कमी करण्यात बँकेस यश आले आहे.

सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक व पतसंस्थांसाठी ठेवीच्या व कर्जांच्या आकर्षक योजना मागील वर्षात बँकेने राबिविल्या त्यास ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नव्या वर्षात छोट्या उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांना ATM, QR कोड द्वारे व्यवहार व मोबाईल बँकिंग अशा अनेक सोयी देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. आपल्या भक्कम पायावर आगामी सर्व आर्थिक बदलांना सामोरे जाण्यास बँक सक्षम असल्याचे चरेगांवकर यांनी सांगितले.

बँकेच्या या प्रगतीसाठी बँकेस सहकार्य करणारे ठेवीदार, ग्राहक, व्यवस्थापन मंडळ सदस्य, संचालक, सल्लागार, सेवक व विकास अधिकारी यांना शेखर चरेगांवकर यांनी धन्यवाद दिले आहेत. बँकेच्या व्यवस्थापन मंडळात सौ.कल्पना गुणे, अॅड.विशाल शेजवळ, राहुल कुलकर्णी, डॉ.विनीत कुलकर्णी, शार्दुल चरेगांवकर यांचा समावेश आहे. नुकतीच बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक देखील बिनविरोध पार पडली आहे. या संचालक मंडळामध्ये अध्यक्ष शेखर चरेगांवकर, उपाध्यक्ष अजित निकम, संचालक नानासाहेब पवार, प्रा.श्रीकृष्ण जोशी, अवधूत तथा बाबूजी नाटेकर, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, महेशकुमार जाधव, डॉ.प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, डॉ.सचिन साळुंखे, सुहास हिरेमठ, प्रा.प्रशांत जंगाणी, सौ.कल्पना गुणे, सौ.अनघा कुलकर्णी यांचा समावेश आहे. तर तज्ञ संचालक म्हणून अॅड.विशाल शेजवळ यांची निवड झाली आहे. सन २०२५ साली बँक आपला सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहे. नूतन संचालकांच्या सहकार्याने सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी बँक एक व्हिजन व मिशन समोर ठेवून नेत्रदीपक प्रगती करेल अशी खात्री यानिमित्ताने चरेगांवकर यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment