वेध माझा ऑनलाइन - राज्यात तापमानाने प्रचंड उच्चांक गाठला आहे. मार्च महिन्यात तर अंगाची अक्षरश: लाही लाही व्हावी इतकं ऊन पडलं. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अक्षरश: 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये आजही उष्णतेची लाट आहे. तापमानाचा हा पारा मे महिन्यात आणखी किती चटके देणार हे येणाऱ्या काळात आपल्याला अनुभवायला मिळेलच. पण हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. पावसामुळे गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा गारवाचा विसावा मिळेल. पण या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये तुरळक, तर काही ठिकाणी वादळी, वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 एप्रिल आणि 22 एप्रिल या दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी काही ठिकाणी 23 एप्रिलला देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर 24 आणि 25 एप्रिल रोजी आकाश निरभ्र राहणार आहे. त्यावेळी कदाचित आपल्याला ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागतील. विशेष म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण आहे. याशिवाय थंड वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. ऊन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशाप्रकारचा गारवा मिळत असल्याने त्या परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. पण ग्रामीण भागांमध्ये अशा वातावरणाता नागरिकांना फटका बसू शकतो. कारण शेतीचं नुकसान होऊ शकतं.
No comments:
Post a Comment