वेध माझा ऑनलाइन । राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला असताना आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातही तसेच दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. आधी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मुत्सद्देगिरीवरून टोला लगावल्यानंतर त्यावर शरद पवारांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला होता. आता माध्यमांशी बोलताना पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.दरम्यान माझं म्हणणं एवढंच आहे की मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, त्यामुळे इतिहास बदलत नाही असाही टोला फडणवीसांनी पुन्हा पवारांना लगावला आहे
नेमका वाद काय?
देवेंद्र फडणवीसांनी रविवारी भाजपाच्या एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर टीका करण्यासाठी शरद पवारांच्या पुलोद सरकारच्या प्रयोगाचा दाखला दिला. “१९७८ मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?” असा सवाल फडणवीसांनी केला होता... त्यानंतर... पवारांनी फडणवीसांच्या या खोचक बोलण्याचे उत्तर देताना...फडणवीस त्यावेळी लहान असतील...त्यामुळे त्यांना काही माहीत नसेल...असा उलट टोला लगावला होता
“शरद पवार म्हणाले ते खरं आहे”
दरम्यान, आता शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा टोला लगावला आहे. “शरद पवार म्हणाले ते खरं आहे की १९७७ मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. पण मी काल जे बोललो, ते एकतर शरद पवारांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी ते त्यांना अस्वस्थ करणारं होतं. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“१९७८ साली शरद पवारांनी वसंतदादा पाटलांबरोबर ते मंत्री होते त्यावेळी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले ४० लोक बाहेर काढले आणि भाजपाबरोबर त्यांनी सरकार तयार केलं. आता एकनाथ शिंदे तर आमच्याबरोबरच निवडून आले होते. ते तिथून ५० लोक घेऊन बाहेर पडले. त्यांनी आमच्याबरोबर सरकार स्थापन केलं. मग शरद पवारांनी तयार केलेलं सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी तयार केलेलं सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते? मी कुठेही शरद पवारांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही.एकनाथ शिंदेंची केस तर मेरिटची आहे. एकनाथ शिंदे आमच्याबरोबर युतीत निवडून आले. शरद पवार तर काँग्रेसबरोबर निवडून आले होते आणि नंतर भाजपाबरोबर आले”, असं फडणवीस म्हणाले.
“माझं म्हणणं एवढंच आहे की मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, त्यामुळे इतिहास बदलत नाही. कुणीही जन्माला आलं, नाही आलं, कधी आलं यावर इतिहास ठरत नसतो. इतिहासात हे लिहून ठेवलं आहे की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ४० लोकांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि भाजपाबरोबर सरकार तयार केलं. तेच मी सांगितलंय”, असंही फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment