Saturday, July 15, 2023

राज्यातला विरोधी पक्षनेतेपदाचा पेच अधिवेशनाआधी सुटणार का? काँग्रेसचे नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संग्राम थोपटे यांची या पदासाठी चर्चा ...

वेध माझा ऑनलाईन।  महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या विरोधी पक्षनेतेपदाचा पेच आणि संभ्रम कायम आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतल्या  फुटीनंतर सभागृहातल्या संख्याबळाचे आकडे सातत्यानं बदलतायत. त्यात विधानसभा अध्यक्ष आता अधिवेशनाआधी निर्णय घेणार का, त्यांना ते बंधन आहे का, किती लवकर राज्याला विरोधी पक्षनेता  मिळणार असे सगळे प्रश्न निर्माण झालेत. 

महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन आता तोंडावर आलंय आणि विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार याचा पेच कायम आहे. महिनाभरापूर्वी विरोधी पक्षनेते असलेले अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीनं निवडलेले जितेंद्र आव्हाड यांच्या नावावर विधानसभा अध्यक्षांचं शिक्कामोर्तब नाही. आणि तिसरीकडे काँग्रेस संख्याबळाच्या आधारावर आता आपलाच दावा करतेय. त्यामुळे राज्याचा नवा विरोधीपक्षनेता नेमका कोण हेच अजून ठरायचं आहे. 

काँग्रेसनं गटनेते पदावर दावा करण्याची शक्यता
 विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. राष्ट्रवादीत शरद पवार गटानं सुरुवातीला केवळ नऊच आमदार ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केली. पण आता राष्ट्रवादीनं आणखी 12 जणांविरोधात कारवाईची मागणी केलीय. म्हणजे एकूण 21 आमदार सोडून गेल्याचं शरद पवार यांचा गट अधिकृतपणे मान्य करतोय. या स्थितीत 44 जागा असलेला काँग्रेस पक्ष हाच विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करु शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीनं जितेंद्र आव्हाड यांची केलेली निवड ही तात्कालिकच ठरणार हे उघड.राष्ट्रवादीत कुठला गट अधिकृत, कुठला गटनेता अधिकृत यासाठीची याचिका अध्यक्षांसमोरच आहे. त्यावर ते यथावकाश निर्णय देतील. पण त्याआधी काँग्रेसनं गटनेते पदावर दावा केल्यास त्यावर त्यांना निर्णय घ्यावा लागेल. 

काँग्रेसमध्ये  विरोधी पक्षनेतेपदासाठीचे काँग्रेसमधले दावेदार?
नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संग्राम थोपटे यांची या पदासाठी चर्चा आहे.

No comments:

Post a Comment