Monday, July 15, 2024

आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन योजना ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

वेध माझा ऑनलाइन।
विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो पावलं पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता फक्त आणि फक्त आपल्या माऊलीच्या भेटीच्या ओढीनं ही पावलं मैलोन् मैलचं अंतर पार करत पंढरीकडे चालत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. आता याच माऊलीच्या भक्तीनं न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ केला आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, महामंडळाचं भाग भांडवल 50 कोटी इतक असणार आहे. तसेच, कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे. 

 आषाढीपूर्वीच शासन निर्णय 

राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली होती. राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर आषाढी एकादशीच्या आधीच शासन निर्णय काढून राज्य सरकारनं अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळा'ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपुरात असणार आहे.

No comments:

Post a Comment