उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर सर्वात मोठी घोषणा केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचं काय होणार? असा प्रश्न आता निर्माण होतोय.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेत आहेत. विशेष म्हणजे देशात नुकतीच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी असलेले हे तीनही पक्ष एकत्र लढले. या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन काही ठिकाणी मतभेद होताना दिसले. पण तीनही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणूकही हे पक्ष एकत्र लढवणार आहेत. असं असलं तरी अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढणार, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत अजित पवारांच्या घोषणेनुसार घटना घडल्या तर महायुतीमधील मित्रपक्षांचे उमेदवारच महापालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या वॉर्डमध्ये परस्परांच्या विरोधात उभे राहू शकतात.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांनी आज याबाबबतची मोठी घोषणा केली. स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षात काम व्यवस्थित करा”, अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. “आपण लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक एकत्र लढत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत”, असं अजित पवार स्पष्ट म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणूक कधी होणार?
“आज पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घ्यायचे होते. पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही. सर्व गुरूंना वंदन करतो. काही अफवा पसरवल्या जातात. पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत. विकासासाठी आपण निर्णय घेतला. विरोधी पक्षात राहून आंदोलन करून विकास होत नाही. प्रश्न सुटत नाहीत. काहीजण तिकडे गेले. त्यांना ते स्वातंत्र्य आहे. आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावं लागणार आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला आणि आपण इथपर्यत पोहचलो. अनेक जण पक्षात आले आहेत. त्यांचं स्वागत करतो. अंदाज आहे की विधानसभा निवडणुका या ऑक्टोबर शेवटपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिला आठवड्यात होतील. पुण्यात राज्यातील सर्वात मोठं एक दिवसीय शिबीर घ्यायचे आहे. बालेवाडी येथे बुकिंग करण्याचे कार्यकर्त्यांना सागितलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.
No comments:
Post a Comment