वेध माझा ऑनलाईन। कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडून दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि हुपरी येथे छापे टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील काही महत्त्वाची कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू पथकांनी जप्त केल्या. कोल्हापूर आणि नाशिकसह देशात पाच राज्यातील 14 ठिकाणी छापे टाकल्याचे एनआयएने रविवारी सांगितले. या कारवाईमुळे कोल्हापुरातील संशयितांचे दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे समोर येत आहेत.
अत्यंत गोपनीयरित्या कारवाई
एनआयएच्या रेकॉर्डवरील दोन दहशतवादी पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर दहशतवाद्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील वावर तपासातून समोर येत आहे. एनआयएच्या पथकांनी शनिवारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील १४ ठिकाणे छापे टाकले. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नाशिक येथे टाकलेल्या छाप्यांमधून काही महत्त्वाची माहिती पथकांच्या लागली आहे. यात संशयास्पद कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे यासह मोबाइल, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तीन संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. यातील दोघे 30 ते 35 वयोगटातील आहेत, तर एक अंदाजे 45 वर्ष वयाचा आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीयरित्या करण्यात आली.
स्थानिक पोलिसांना माहिती नाही
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना दिली नाही. कारवाई करून पथके परतल्यानंतरच याची माहिती एनआयएने जाहीर केली. याबाबत कोल्हापूर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'एनआयए, एटीएस किंवा आयबी अशा राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असतात. ते अधिकारी गरज असेल तरच स्थानिक पोलिसांची मदत घेतात. एनआयएने जाहीर केलेल्या प्रेसनोटशिवाय शनिवारी जिल्ह्यात झालेल्या कारवायांबद्दल अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही.'
No comments:
Post a Comment